रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि मुंबईतील इकोरॉक्स या सामाजिक संस्थेत सामंजस्य करार झाला असून, या अंतर्गत महाविद्यालयामार्फत गोळा केल्या जाणाऱ्या ई-कचऱ्यावर ‘इकोरॉक्स’तर्फे प्रक्रिया केली जाणार आहे.
वाया गेलेल्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, सीडी, टीव्ही, इस्त्री, फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन, वायर्स, बॅटरी अशा अनेक वस्तूंचा ई-कचऱ्यामध्ये समावेश आहे. हा कचरा महाविद्यालातर्फे गोळा केला जाणार आहे. गणेशोत्सव किंवा दिवाळी या कालावधीत घरातील अडगळीत पडलेल्या या वस्तू बाहेर काढल्या जातात. याचे औचित्य साधून १९ ते २२ सप्टेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत महाविद्यालयात या वस्तू स्वीकारल्या जाणार आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जैव विघटनशील व जैव विघटनशील नसलेला कचरा वेगवेगळा गोळा करून त्याचे व्यवस्थापन केले जाते. या बरोबरच तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणावर ई-कचरा निर्माण होऊ लागला आहे. या कचर्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होतो. या कचर्याचे व्यवस्थापन विशिष्ठ पद्धतीने करावे लागते. काही मोजक्याच संस्था असे व्यवस्थापन करतात. हा कचरा गोळा झाल्यानंतर राज्य व केंद्र शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून या कचर्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी पालिकेच्या अनेक गाड्या कचरा गोळा करणार्यासाठी नियमितपणे शहरात फिरतात. त्यांनाही यासंदर्भातील माहिती देऊन असा ई-कचरा गोळा करून महाविद्यालयाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
‘औद्योगिक व घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सर्व प्रकारचे संगणक, हार्डवेअर व सीडी, टेप, फ्लॅश ड्राईव्ह, प्रिंटर्स, टीव्ही, मोबाईल, कंट्रोलर्स, ईपीबीएक्स, फोन, फॅक्स मशिन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, टॉर्च, इस्त्री, तसेच फॅन्स, केबल, वायर्स, फ्रीज, वॉशिंग मशीन्स, एसी, व्हॅक्युम क्लीनर, मिक्सर्स, स्वीच (बटण) आणि लीड अॅसिड बॅटरी, एनआय-सीडी बॅटरी, अल्कलाइन बॅटरी अशा प्रकारचा ई-कचरा नागरिकांनी महाविद्यालयात जमा करावा,’ असे आवाहन करण्यात आले आहे.